नागालँड सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे; रामदास आठवलेंची मागणी
मुंबई : नागालँडमध्ये आज मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नागालँडमध्ये भाजप आघाडीवर असून विजयाच्या जवळ आहे. तर, रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इतिहास रचला आहे. आठवले गटाचे नागालँडमध्ये दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रबाहेर पहिल्यांदाच आठवलेंचे दोन आमदार निवडून आले आहेत. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्रिपुरा, नागालँड, मेघालय येथे भाजप एनडीए सरकार स्थापन होत आहे. नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाने आमच्या पक्षाने 8 जागांवर निवडणूक लढवली. यातील आम्ही 2 जागा जिंकल्या आहेत. नरेंद्र मोदींच्या कामामुळेच आम्ही निवडणुका जिंकल्या आहेत. आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असे आठवलेंनी जाहीर केले.
मी 4 मार्च रोजी जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेणार आहे. आमचे दोन उमेदवार विजयी झाल्यास आम्हाला नागालँड सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे, ही आमची मागणी आहे, असे रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रात आपण एक जागा जिंकलो आणि एक हरलो, निवडणुकांमध्ये विजय सुरूच असतो, अशीही प्रतिक्रिया त्यांनी कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीवर दिली आहे.
दरम्यान, आरपीआयचे इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर-2 ही जागा जिंकली आहे. इम्तिचोबा ४०० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ५५१४ मतं मिळाली. नोक्सेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिमा ओनेन चँग विजयी झाले आहेत. त्यांनी ५१५१ मतं मिळाली आहेत.