रोहित पवारांची अजित पवारांवर टीका; स्वार्थी प्रवृत्तींनी स्वाभिमान गहाण टाकला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आहे. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. तर, शरद पवार गटानेही प्रतिवाद केला आहे. पुढची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरद्वारे अजित पवार यांच्यावर रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे.
ज्या माणसाने पक्षाला आणि पर्यायाने नेत्यांना उभं केलं, ताकद दिली, आज त्याच स्वार्थी नेत्यांनी आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात उभं केलं आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
या स्वार्थी प्रवृत्तींनी आपला स्वाभिमान गहाण टाकला असला तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या ताकदीने आदरणीय पवार साहेबांसोबच्या पाठीशी आहेत आणि हीच साहेबांची खरी ताकद आहे. याच ताकदीच्या बळावर महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा विचार जपण्यासाठी हा सह्याद्री लढतोय आणि या लढाईत त्यांचा विजय होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आमदारांची संख्या आमच्या बाजूने अधिक असल्याचा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केला आहे. तर, जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही अजित पवार गटाने म्हंटले आहे. तर, निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडे ठेवा. निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी विनंती शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला केली आहे.