पंतप्रधान असताना काय केले? सामनातून सवाल

पंतप्रधान असताना काय केले? सामनातून सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीतील जाहीर सभेत नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीतील जाहीर सभेत नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? मी त्यांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल मोदी यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, मोदी शिर्डीत आले व पुन्हा एकदा खोटे बोलून गेले. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पण त्यांनी सांगितले, "महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?" असा प्रश्न मोदी यांनी केला. मोदी यांनी पवार यांच्याबाबत आपण आधी काय बोललो व आता काय बोललो हे तपासून घ्यायला हवे होते. खरं तर मोदी सरकारनेच शरद पवार यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मविभूषण' दिला व आता मोदी नेमके उलटे बोलत आहेत. गोंधळलेल्या मानसिकतेचे हे लक्षण आहे. 'यूपीए' सरकारच्या काळात पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते. पंजाबराव देशमुखानंतर लाभलेले पवार हे सर्वोत्तम कृषीमंत्री होते व त्यांनी त्याच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी उत्तम योजना राबवल्या. त्यात आता पडायचे नाही, पण मोदी यांनी गेल्या दहा वर्षात जे बहुरंगी कृषिमंत्री देशाला दिले त्यांनी काय केले? त्यांना शेतीतले किती कळत होते? असा सवाल विचारण्यात आला आहे.

चार महिन्यापूर्वी त्यांनी अजित पवारांवर 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा व शिखर बँकेच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. काल शिर्डीत तेच अजित पवार मोदी यांच्या शेजारी भाजपपुरस्कृत उपमुख्यमंत्री म्हणून बसले व अजित पवारांसमोर मोदी हे शरद पवारांची 'बदनामी करीत होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान व अभिमान मेल्याचे हे चित्र आहे. पवारांनी काय केले याचे उत्तर अजित पवार हे आहे. पवारांनी घडवलेले अजित पवार हे मोदींच्या व्यासपीठावर होते व अजित पवारांना फोडले तरी 82 वर्षाचे पवार अजून मैदानात आहेत. असे सामनातून म्हटले आहे.

मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱ्या देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले? सध्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तर मोदी यांनी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले. कृषिमंत्री पदाविषयी मोदी यांची ही आस्था आहे. देशाचे कृषी मंत्रालय वाऱ्यावर आहे. मोदी यांच्या कारकीर्दीत चार-पाच कृषिमंत्री झाले. 'यूपीए' काळात सलग दहा वर्षे शरद पवार हेच देशाचे कृषिमंत्री होते. चार- पाच वर्षापूर्वी मोदी हे पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे नेतृत्वगुणांचे कौतुक करीत होते. पवार हे कृषिमंत्री असताना त्यांच्या गुजरातला कशी मदत करीत होते, त्याचे कीर्तन करीत होते. असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com