'पोकळ' बैठक; मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार

'पोकळ' बैठक; मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार

राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण या विषयावर बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीस छत्रपती संभाजीराजे अनुपस्थित राहिले. यावर संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

अमोल धर्माधिकारी | मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण या विषयावर बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीस छत्रपती संभाजीराजे अनुपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली. मराठा आरक्षणाविषयक कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज प्रथमच अशा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षण पेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

'पोकळ' बैठक; मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय घडलं?

संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते. मात्र, मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला. पण सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही.

सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे संभाजीराजेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com