शिवरायांच्या अपमानावेळी मोर्चेकरांच्या तोंडात बूच होते का? राऊतांचा सवाल
मुंबई : लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा आझाद मैदान येथे काढण्यात आला होता. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी आणि शहा यांच्या विरोधात त्यांनी जो आक्रोश मोर्चा केला. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
ती भाजपचीच रॅली होती. तो काही हिंदू जनआक्रोश वगैरे नव्हता. लोकांचा असा गैरसमज आहे की तो मोदींच्या विरोधातील आक्रोश होता. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. खरंतर भाजपमध्ये मोदी शहा फडणवीस यांच्या सारखे कडवट नेते असताना लव्ह जिहाद होत असेल तर हे योग्य नाही. हे सरकारचं अपयश आहे. त्यामुळे ते बहुधा न्याय मागण्यासाठी ते बाळासाहेब ठाकरेंसमोर आले असावे, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान चालतो का? तेव्हा मोर्चेकरांच्या तोंडात बूच असते. काश्मीरचा अपमान चालतो. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान केला जात नाही. हे चालते तेव्हा हे बोलत नाहीत, असेही राऊतांनी म्हंटले आहे.