...नाहीतर मानेवर वसुलीची ‘सुरी’ फिरवू; शिवसेनेचा शिंदे सरकारवर टीकास्त्र

...नाहीतर मानेवर वसुलीची ‘सुरी’ फिरवू; शिवसेनेचा शिंदे सरकारवर टीकास्त्र

शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे

मुंबई : नगर जिल्हय़ातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. वीज बिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरणने पोपट जाधव यांचे वीज कनेक्शन तोडले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे. पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का, हाच प्रश्न आहे, असे शिवसेनेने विचारले आहे.

राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरू आहे. राज्यकर्ते कितीही ‘सकारात्मक’ वगैरे वातावरणाचे दावे करीत असले तरी राज्यात त्याच्या विपरीतच घडत आहे. उद्योग-व्यवसाय राज्याबाहेर जात आहेत. गोवरची साथ आटोक्यात आलेली नाही. शेतकरी आधी अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात सापडला होता. आता तो मिंधे सरकारच्या तावडीत सापडला आहे. या सरकारच्या कारभाराने राज्यातील आणखी एका थकबाकीपीडित शेतकऱयाचा बळी घेतला आहे. वीज बिलाची थकबाकी हा सरकारसाठी प्रश्न असला तरी त्याचे उत्तर तुम्ही बळीराजाच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवून मिळविणार आहात का, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

थकबाकीसाठी कुठल्याही शेतकऱ्याची वीज कापली जाणार नाही, असे पत्रक काढल्याच्या गमजा हे सरकार मारते आणि दुसरीकडे नगर जिल्हय़ात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यावर स्वतःचे जीवन संपवून घेण्याची वेळ येते. आता या घटनेवरही मिंधे सरकारतर्फे थातूरमातूर खुलासा केला जाईल. पोपट जाधव यांच्या शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, पण त्यामुळे त्यांचा जीव परत येणार आहे का? त्यांच्या उघडय़ावर पडलेल्या कुटुंबाचे काय? राज्य सरकारकडे या प्रश्नांचे काय उत्तर आहे? मुळात हे सरकार स्वतःच मिंधे आहे. त्याला फक्त खोक्यांचीच भाषा कळते. त्यांना त्यांच्याच कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोळय़ांत आलेल्या अश्रूंची भाषा काय कळणार?

खरीपाचे पीक अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. त्याच्या नुकसानभरपाईच्या मोठमोठय़ा गप्पा मिंधे सरकारने मारल्या. नुकसानभरपाईचे आकडेही फुगवून सांगितले. प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या खात्यात त्यातील किती रक्कम जमा झाली, हा प्रश्नच आहे. पीक विम्याच्या भरपाईबाबतही वेगळी स्थिती नाही. अशा असंख्य अडचणींशी लढा देत शेतकऱ्याने मोठय़ा उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र, महावितरण नावाची ‘टोळधाड’ रब्बीचे पीकही उद्ध्वस्त करीत आहे.

सरकार म्हणते, ‘फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीज बिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.’ महावितरण म्हणते, ‘वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची ‘सुरी’ फिरवू.’ मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे. या कारभाराच्या कचाटय़ात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्हय़ातील पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का, हाच प्रश्न आहे, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com