'खासदारकीचा राजीनामा द्या अन् पुन्हा निवडूण येऊन दाखवा' राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आव्हान
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावरच आता शिंदे गट नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा आणि हिम्मत असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे थेट आव्हान दिले आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, आमच्या जीवावर तुम्ही खासदार झाला आहात. त्यामुळे त्यांनी बोलताना आता तोंड सांभाळून बोलावे. आता यावेळी त्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीत निवडूण येऊन दाखवा. असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी राऊतांना दिले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्वे असतात, तेव्हा त्यांना ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्वे भाजपाच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्याविरोधात आहे. तो त्यांना नको आहे. त्या सर्वेनुसार मविआला लोकसभेच्या साधारण ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा साधारण ४० ते ४५ असतील. मुख्यमंत्री म्हणाले की ४-५ जागा मिळाल्या तरी पुरे. त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा जरी वाचवली तरी पुरे. असं संजय राऊत म्हणाले.