बावनकुळेंच्या टीकेला दानवेंचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, स्वत:ची बी टीम म्हणून ओवैसी...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काल राज्यात राजकारणात उलथा- पालथ करणारी बातमी समोर आली. काल शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली. त्यावरून एकच राजकीय मंडळींची प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली होती. त्यावरच शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले दानवेंनी प्रत्युत्तर?
बावनकुळेंना उत्तर देताना दानवे म्हणाले की, असदुद्दीन ओवैसी आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे हे बिहार, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतून दिसून आलेले आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष स्वत:ची बी टीम म्हणून ओवैसी यांना वापरत आलेला आहे. तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. वैचारिक मतभेत असू शकतो. त्यांनी त्या-त्या वेळेस तो केला असेल. आम्हीही त्यांना विरोध केला असेल. मात्र हा विरोध कायम असाच ठेवायचा का. हा विरोध सोडून पुढे काही करायचे नाही का? म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. असे अंबादास दानवे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, राजकीयच नव्हे तर सामाजिक परिवर्तनही गरजेचे आहे. याच कारणामुळे आगामी काळात ही युती राज्यात परिवर्तन घडवून आणणार, पुढील निवडणुकीला महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाहीत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर बोलताना तुम्ही आमच्या पक्षाची चिंता करू नका, असा सल्ला देखील दानवेंनी बावनकुळेंना दिला.