मुंबईवर येवढा राग का आहे? आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला संतप्त सवाल
मिनाक्षी म्हात्रे| मुंबई: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून जुंपलेली दिसून येते. याच वादादरम्यान आज ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे- फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला. मेट्रो-6 प्रकल्पासाठी जागा देण्यावरून आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गमधील जागेवरून शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. त्यामुळे मेट्रो- 6 ला जागा देण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सकाळी आपण बातमी वाचली असेल. महसूल खात्याने सांगितलं आहे की कांजूरची 15 हेक्टर जागा हस्तांतरित मेट्रोला करत आहोत. ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून फार मोठी. आम्ही सतत बोलत आलो लाईन ६ गरजेची आहे. उद्धव ठाकरेंनी कारशेड कांजूरमार्गला हलवली होती. 44 हेक्टरच्या प्लॉटमद्ये आपण कारशेड करणार होतो. याचं कारण होतं आपण पैसे वाचवणा होतो. जनतेचे पैसे वाचावे, वेळ वाचावे यासाठी प्रयत्न सुरु होते. यातून दहा ते साडे दहा कोटी रुपये आपण महाराष्ट्राचे वाचवले असते. याशिवाय वेळ वाचवला असता. असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, 4 कारडेपो आपण एकत्र करत होतो. 36 मुंबईतील आणि 4 आणि 14 एमएमआरमधील होत्या. कांजूरमार्गमध्ये इंटिग्रेटेड डेपो झाला असता. सर्व गाड्या मेंटनन्स वॉशिंगसाठी आल्या असत्या. आरेमध्ये आपण 800 एकर जंगल घोषीत केलं. मेट्रो लाईन 3 आणि लाईन 6चं काम न थांबवता आपण कारशेड हलवणार होतो. काही लोकांनी गोंधळ घातला, कोर्टात केसेस केला.त्यानंतर सरकार पडलं आणि यांनी आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेतला. आरेमध्ये आताही झाडे कापण्याचा प्रयत्न होतोय. माझा सरकारला प्रश्न आहे. मुंबईवर येवढा राग का आहे? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी शिंदे- फडणवीस सरकारला केला.