कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज - अंबादास दानवे
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना आज पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु आहे. या अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याचा मुद्दा अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद गेल्या ६१ वर्षापासून प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून सतत दुटप्पी भूमिका घेतली जात आहे.
एकप्रकारे महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींना अडवलं जातंय, हे म्हणजे आपण भारत पाकिस्तान सीमेवर राहतो का? असा प्रश्न पडण्यासारखेच आहे. बेळगाव कर्नाटक सीमावादातील ८७५ गावांचा प्रश्न हा आजचा नाही, तरी जत, सोलापूर, अक्कलकोट मध्ये कर्नाटक सरकार सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे. कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे. यामुळे तेथील मराठी बांधवांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने, विधिमंडळ व सरकारने यासाठी एकत्र आलं पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री व तेथील नेते ज्याप्रमाणे एकत्र येऊन आक्रमक भूमिका मांडतात त्याप्रमाणे सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.