एखाद्याचं राजकीय करिअर कसं संपवायचं, एवढंच यांना माहिती; सावंतांचा फडणवीसांवर निशाणा
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. या सर्वादरम्यान शिंदे- फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. यावेळी देखील सत्ताधारी गटाने दिशा सॅलियान आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली. त्यावरच आता एसआयटी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी का नेमण्यात येत नाही, असा सवाल शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले सावंत?
मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी नेमली, तशीच जस्टीस लोयाच्या बाबतीत का नेमत नाही. एसआयटी फक्त ‘चुन चुन के लगाना’ हे नैतिकतेला धरून नाही. इकडंच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच आदित्य ठाकरे यांना बदनाम केलं जातं आहे, असा आरोपही सावंत यांनी केला.
पुढे ते म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकार कुठल्या पातळीवर चाललं आहे, याची नोंद प्रधानमंत्री घेत आहेत की नाही? लोकशाहीचा गळा घोटाण्याचं काम सुरू आहे. खोके आणि सत्ता यापलीकडे या सरकारला काय पडलेलं नाही. एसआयटी लावून एखाद्याचं राजकीय करिअर कसं संपवायचं, एवढंच यांना माहिती आहे. गेल्या ७५ वर्षात जे झालं नाही, ते आता काय होतंय. देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी बदला घेतला’ असा उल्लेख केला आहे. पण, राज्य सरकार आता जे करत आहे, ते स्वतः ची कबर खोदत आहे, अशा शब्दात त्यांनी राज्यसरकारला सुनावले आहे.