मुंडक छाटण्याची भाषा न करता, भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा; राऊतांचे उदयनराजे यांना आव्हान
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आजही कायम आहे. राज्यपालांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष प्रचंड तीव्र झाला आहे. राज्यपालांच्या या विधानाचा भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी देखील तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. आज उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या विधानाचा पुन्हा समाचार घेतला त्यावेळी ते म्हणाले एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात, अशा भाषेत त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावरूनच आता शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी उदयनराजेंना आव्हान दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, उदयनराजे भोसले यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे यांच्या वाणीतून होत असतो. ते सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. त्यांच्या मनातून चिड बाहेर येणं स्वाभाविक आहे. त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. भाजपनं आमच्या दैवताचा आपमान केला आहे. उलट त्यांचं समर्थन केलं जातं. अशावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही, असं मला वाटतं, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गाजतोय. त्यातच कर्नाटकच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहीलं. तिथं महाराष्ट्रातील मंत्र्यांना पाठवू नका. त्यावरच एकच गदारोळ सुरु झाला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अत्यंत हतबल, लाचार सरकार राज्यात आहे. हे काहीही करू शकणार नाही. महाराष्ट्रानं दोन समन्वयक मंत्री नेमले आहेत. पाकिस्तानला जायला बंदी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जायला काय. अनेक मंत्री-आमदार जातात-येतात. आमचं वैयक्तिक वाद नाही. हा माणूसकीचा लढा आहे. अन्याय, अत्याचाराविरोधातील लढा आहे. तुम्ही जाऊन दाखवा तिथं. यांचा काय भरोसा. यांनीचं सचिवांना पत्र पाठवा म्हणून सांगितलं, असेल, अशी शंका व्यक्त केली. पंतप्रधान काय करणार. त्यांनी हा प्रदेश केंद्रशासित करावा. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडं वजन आहे. मग, हा प्रदेश केंद्रशासित करून घ्यावा, असंही संजय राऊत म्हणाले.