शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले; राऊतांची शिंदे गटावर जोरदार टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध चालू आहे. त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील देखील वाद काही शांत होण्याचे नाव घेत नाहीये. अशातच मुंबईतील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले होते. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे साडेचार तास बसलो होतो, असा दावा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यावरच आता शिवसेना ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
सर्व गोष्टी पैशांने विकत घेता येत नाहीत. समोर बसलेले श्रोते शिवसेनेचे धन आहे. हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. आपण बंडखोरी केली पाहिजे याचे बीज मीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात भरवले, असे एक माजी मंत्री म्हणाला. अरे तुझं नशीब फुटलं आहे. तू फुटला नाहीस. भविष्यात तुम्हाला कळेल. असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, संजय राऊत जे बोलतो ते घडंत. मला भविष्यात काय घडणार याची माहिती आहे. महाभारतात जसा एक संजय होता, अगदी तसाच एक संजय शिवसेनेत आहे. हा संजय कायम कुरुक्षेत्रावरच असतो. लढत असतो, असेही राऊत यावेळी म्हणाले.
विजय शिवतारे काय म्हणाले?
२०१९ मध्ये राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, ते राज्याच्या हिताचे नव्हते. पहिल्या दोन महिन्यातच उचल खाल्ली होती. हा उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजयबापू शिवतारेंनी घातलं”, असे शिवतारे म्हणाले होते.