राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा भाजपची स्क्रीप्ट, सुषमा अंधारेंचा घणाघात
राज्यपाल भगतसिंग यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानामुळे राज्यात प्रचंड वादंग निर्माण झाले होते. सोबतच राज्यपालांना पदमुक्त करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत होती. या सर्वादरम्यान आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशी चर्चा सुरु होती. त्यावरच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
भगतसिंग कोश्यारींनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपालांच्या विरोधात सगळीकडून टिकेची राड उठवली जाते. त्यामुळं राज्यपालांना पायउतार व्हावचं लागेल. त्यामुळं भाजप आता कांगावा करत आहे. राज्यपाल यांनी स्वतः पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. मुळात इच्छा नाही. राज्यपालांना जाणेचं आहे. त्यांना पायउतार व्हावचं लागणार आहे. राज्यपालांना पायउतार होण्याची नामुष्की टाळण्यासाठी राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छितात, अशी एक नवी स्क्रीप्ट भाजपकडून रचली जात आहे. पण, ती स्क्रीप्ट महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावला आहे.यावर अंधारे म्हणाल्या की, सरकार त्यांचं आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. संजय राऊत यांचं स्पिरीट आम्हाला माहीत आहे. समन्स, नोटिसा, कारवाई किंवा तुरुंगवास असला, तरी राऊत यांचं स्पिरीट कशानंही झुकणार नाही. थांबणार नाही. ते लढत राहणार आहेत. त्यांच्याविरोधात प्रचंड कट रचले जात आहेत. संजय राऊत कशात अडकू शकतात. काय खोट्यानाट्या केसेस दाखल केल्या जाऊ शकतात. सगळ्या कल्पना आहे. तरीही आम्ही लढणार आहोत, असे अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितले.