श्रध्दा वालकर प्रकरणातील आरोपीला भरचौकात फासावर लटकवले पाहिजे : संजय राऊत
मुंबई : दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. श्रद्धा वालकर ही मूळची वसईतील राहणारी असून तिचा प्रियकर आफताबनेच तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रध्दा वालकर प्रकरण धक्कादायक व दुर्देवी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, श्रध्दा वालकर प्रकरण धक्कादायक व दुर्देवी आहे. समाजमाध्यामातून ओळखी होतात. या ओळखीचे रुपांतर पुढे असे भयंकर नात्यामध्ये होते. ज्या प्रकारे त्या मुलीचे तुकडे-तुकडे करुन मारले. त्या मुलीच्या वडीलांची मुलाखत मी वाचली. त्यांचा आक्रोश व वेदना समजून घेतल्या पाहिजेत. तसेच, आजचा तरुण कोणत्या धुंदी आणि गुंगीमध्ये जगतात हे आज परत एकदा समजले आहे. देशभरातील मुलींनी सावधपणे जगण्यास शिकले पाहिजे. याप्रकारे फसवून जे काही केल जातंय ही विकृतीच्या पुढचे पाऊल आहे, अशेही त्यांनी म्हंटले आहे.
श्रध्दा वालकर प्रकरणात कोणी राजकारण करु नये. अशाप्रकारच्या आरोपींवर खटलेही चालवू नयेत. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार भरचौकात फासावर लटकवले पाहिजे, अशा भावना राऊतांनी व्यक्त केल्या आहेत.
काय आहे नेमके श्रध्दा वालकर प्रकरण?
श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब या दोघांची एका डेटींग अॅपवर भेट झाली. मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथेच त्यांची मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. घरच्यांचा विरोध झुगारून दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते. हे प्रेमसंबंध जुळल्याचे तिने आपल्या घरी सांगितल्यावर घरच्यांनी तिला विरोध केला होता.
परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये मध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते.