सुनील केदार यांना मोठा दिलासा! उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांनी जामीन मंजूर केला आहे. एक लाखाच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सोबतच 12.50 लाख दंड सुनावला होता. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनील केदार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायालयासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. मात्र, न्यायालयाने केदार यांना जामीन मंजूर केला आहे. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला.
दरम्यान, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. याप्रकरणी सुनील केदार, अशोक चौधरी, केतन शेठ, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांना दोषी ठरवण्यात आले होते. तर इतर तिघांना निर्दोष जाहीर करण्यात आले होते. यासोबतच दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्याने सुनील केदार यांची आमदारकीही रद्द झाली आहे.