मुख्यमंत्री रिफायनरी प्रकल्पासाठी आपलं घर आणि जागा सोडतील का? - सुषमा अंधारे

मुख्यमंत्री रिफायनरी प्रकल्पासाठी आपलं घर आणि जागा सोडतील का? - सुषमा अंधारे

ज्या ठिकाणी स्थानिक भूमीपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहिली अशी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षपमुख उध्दव ठाकरे यांची भूमिका आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

ज्या ठिकाणी स्थानिक भूमीपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहिली अशी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षपमुख उध्दव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे बारसू, सोलगाव, गोवळ पंचक्रोशीतील स्थानिक भुमिपूत्रांनी उभारलेल्या रिफायनरी प्रकल्प विरोधी लढ्यात शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवाचे-गोठणे येथे दिली.सोलगाव, बारसू, गोवळ पंचक्रोशीतील महिला ग्रामस्थांच्या वतीने देवाचे-गोठणे केरावळे येथे हळदी कुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांकडून रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलनाविषयी तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या दमदाटीबाबत माहिती घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला. आपली जमीन आणि घर वाचविण्यासाठी लढणाऱया महिलांवर जर शासन काठ्या चालविणार असेल तर मुख्यमंत्री प्रकल्पासाठी आपल घर आणि जागा सोडतील का? जर मुख्यमंत्री अस करू शकत नाहीत तर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तरी आपली जागा का सोडावी, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

आम्ही महिला चांगला स्वयंपाक करू शकतो, चांगल्या प्रकारे संसार करू शकतो तर मग आमच्या कुटुंबावर कोणी वाकडी नजर करून बघत असेल तर आम्ही त्याला इंगाही दाखवू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. आता निवडणुका आल्या की काही लोक येतील तुम्हाला भ्रमीत करण्याचा प्रयत्न करतील, आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतील, पैशाचे अमिष दाखविले जाईल, मात्र त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन करताना पक्षपमुख ना.ठाकरे यांच्यासह सर्व पक्ष प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल, अशी ग्वाही अंधारे यांनी दिली.

तर रूता सामंत-आव्हाड यांनी रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार मिळेल या केवळ शासनाच्या अफवा आहेत. रिफायनरी प्रकल्प अन्यत्र कोठेही करा पण कोकणात नको, असे सांगितले. रत्नागिरी येथील ॲड . अश्विनी अगाशे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात बंद पडत चाललेले उद्योग वाचविण्यात येथील पालकमंत्र्यांना रस नाही, मात्र रिफायनरी प्रकल्पासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे, यामागे नेमके गौंडबंगाल काय, असा सवाल उपस्थित करत रिफायनरी ही कोकणाला लागलेली कीड असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, दिपक जोशी यांच्यासह पंचक्रोशीतील महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com