राज्यपालांच्या पत्रावर दानवेंचा निशाणा; म्हणाले, बोलवते धनी कोण, हे पुन्हा सिद्ध केले
राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा अवमान केल्यानंतर एकच संताप महाराष्ट्रातून व्यक्त केला जात आहे. राज्यपालांना पदावरून काढण्याची देखील मागणी जोर धरू लागली आहे. याच दरम्यान आता राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली, त्यावरच आता शिवसेना ठाकरे गट नेते अंबादास दानवे यांनी आगपाखड केली आहे सोबतच भाजपावर देखील घणाघात केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेलं पत्र आज उघड झालं. त्यावर बोलताना अंबादास दानवे यांनी ट्विटरवरून टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यपाल महोदयांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून भूमिका विषद केली म्हणे. आपल्या वाचाळपणाचे स्पष्टीकरण दिल्ली दरबारी देऊन आपले बोलवते धनी कोण, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे. असे ते म्हणाले आहे.
पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, माफीवर हा विषय आता थांबणार नाही. या राज्यपालांची हकालपट्टीच व्हायलाच हवी. दिल्लीला केलेले पत्रलेखन ही उरलेली अब्रु वाचवण्याची धडपड आहे. महाराष्ट्राचे मीठ खाऊन येथील मातीला दूषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे केंद्र आणि राज्यपालांनी ध्यानी ठेवावे. असा देखील इशारा दानवेंनी दिला आहे.