भाजप 'गंगा'प्रमाणे, पापमुक्तीसाठी त्यात डुबकी मारा : त्रिपुरा मुख्यमंत्री
नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्ष गंगेसारखा असून डाव्या नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यात डुबकी घेतल्याने त्यांची सर्व पापे धुऊन जातात, असेही साहा यांनी म्हंटले आहे. दक्षिण त्रिपुरातील काक्राबन येथे जनविश्वास रॅली काढण्यात आली होती. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
काय म्हणाले माणिक साहा?
जे लोक अजूनही स्टॅलिन आणि लेनिनच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतात. त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी भाजपमध्ये सामील व्हा कारण ती गंगा नदीसारखी आहे. जर तुम्ही गंगेत पवित्र स्नान केले तर तुमच्या सर्व पापांचा नाश होईल.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (सीपीआय-एम) पक्षावर निशाणा साधला आहे. कम्युनिस्ट पक्षाने लोकांचे लोकशाही अधिकार दडपले आणि त्रिपुरामध्ये वर्षानुवर्षे राज्य केले. कम्युनिस्ट राजवटीत लोकशाही नसल्याचा आरोप त्यांनी केला. कारण त्यांचा हिंसाचार आणि दहशतवादी डावपेचांवर विश्वास होता. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यात डाव्यांच्या राजवटीत ६९ विरोधी नेत्यांची हत्या झाली. काक्राबन हा अपवाद नव्हता येथे अनेक राजकीय हत्या झाल्या, असाही दावा साहा यांनी केला आहे.