माझ्या पद्धतीने काम करावे लागेल नाहीतर...; उदय सामंत अधिकाऱ्यांवर भडकले
सचिन बडे | औरंगाबाद : ऑरिक सिटीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन येथील उद्योजक तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उदय सामंत ऑरिकच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. माझ्या पद्धतीने काम करावे लागेल नाहीतर बदल होण्यास वेळ लागणार नाही, असा दमही उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिला.
मागील काही महिन्यांपासून खड्ड्यातील प्लॉट बदलून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑरिक कार्यालयात खेटे मारावे लागत होते. ही माहिती उद्यागोमंत्र्यांना समजताच ते ऑरिकच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. माझ्या पद्धतीने काम करावे लागेल नाहीतर बदल होण्यास वेळ लागणार नाही, असा दमही उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिला. यामुळे शेतकऱ्याला तब्बल चार तासातच नवा प्लॉट मिळाला. उद्योग मंत्री उदय सामंत अधिकाऱ्यांवर भडकल्यामुळे फायदा झाल्याने शेतकऱ्याने तात्काळ समाधान व्यक्त केले आहे.
जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या महा एक्स्पो बाबत मसिआच्या पदाधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करुन नियोजनाची उदय सामंत यांनी माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की,ऑरिक सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू आहेत आणि अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. ऑरिक सिटीपासून केवळ 900 मीटरवरून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाला ऑरिक सिटी जोडल्यास नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुण्याशी कनेक्टीव्हीटी वाढून वेळेची बचत होणार असल्याने उद्योजक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील.
उद्योग वाढीसाठी काही नवीन योजना सुरू करता येतील का याचाही विचार करण्यात येत आहे. ऑरिक सिटीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करावे, ट्रक टर्मिनल उभारावे, रहिवाशी वसाहतींमधील समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे निर्देश उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी दिवाळीतनंतर मुंबईत बैठक घेणार असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले.