Tata-Airbus Project: युवा पिढीला वाऱ्यावर सोडणार नाही, मोठा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये पुढील वर्षी आणणार : उदय सामंत

Tata-Airbus Project: युवा पिढीला वाऱ्यावर सोडणार नाही, मोठा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये पुढील वर्षी आणणार : उदय सामंत

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ 22 हजार कोटीचा एअरबस-टाटा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ 22 हजार कोटीचा एअरबस-टाटा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावरुन आता विरोधकांनी आता शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकल्प जरी बाहेर गेले असले तरी आम्ही युवा पिढीला वाऱ्यावर सोडणार नाही. मोठा प्रकल्प महाराष्ट्रमध्ये पुढील वर्षी आणला जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

उदय सामंत म्हणाले की, विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्या पलीकडे काहीच करत नाही आहेत. एक वर्षापूर्वीच हा प्रकल्प त्या ठिकाणी नेण्याचा निर्णय कंपन्याने आणि यंत्रणांनी घेतला होता. मी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आम्ही प्रयत्न करू. मागच्या सरकारमध्ये कोणीही हा प्रकल्प परत येण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. कुठेही मागणी केलेली नाही, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

ज्यांनी हा प्रकल्प परत आणण्यास प्रयत्न केले नाहीत त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गेलाय. पण, आता गेलाय असा संभ्रम निर्माण करू नये. वेदांता असेल किंवा हा प्रकल्प असेल हा या आधीच्या सरकारमध्येच राज्याबाहेर गेलेले आहेत ते आत्ताच्या सरकारमध्ये गेलेले नाहीत आणि याबाबत आम्ही पुरावे सादर करू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

हे प्रकल्प जरी बाहेर गेले असले तरी आम्ही युवा पिढीला वाऱ्यावर सोडणार नाही. युवकांना रोजगार देणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे. मोठा प्रकल्प महाराष्ट्रमध्ये पुढील वर्षी आणला जाईल. बेरोजगारी दूर करण्याचा कायम आमचा प्रयत्न राहणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देण्याचे प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असेल, असेही उदय सामंत यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यांनतर महाराष्ट्राला तेवढाच मोठा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. तर, एअरबस आणि टाटा यांचा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हंटले होते. परंतु, एअरबस- टाटा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा या कंपनीने केली. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे. मात्र, हजारो नोकऱ्यांचे आश्वासन देणारा हा प्रकल्प गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी चालना देणारा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com