आगामी निवडणूक स्वबळावरच; राज ठाकरेंची मोठी घोषणा
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या आधी मनसे आणि भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा होती. परंतु, आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांचा आज राज ठाकरेंच्या अध्येक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत मेळाव्याबाबत माहिती दिली.
बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी पॉझिटीव्ह मॅसेज दिला आहे. राज्यात सध्या राजकारण खालच्या थराला जातं आहे. राजकारणात सध्या चिखल पाहायला मिळतोय यामुळे लोक कंटाळली. जे पेरलं जातंय ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पॉझिटीव्ह विचार घेऊन लोकांमध्ये जा. लोक आता राज ठाकरे आणि मनसेला प्राधान्य देतील. आगामी निवडणुक स्वबळावर लढायची आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी मेळाव्यात केल्याचे त्यांनी सांगितले.
जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागतील आपल्याकडे आता ५ महिने आहेत. महापालिकेमध्ये न भूतो असं यश मिळवायचे आहे. मी तुम्हाला विधानसभेत सत्तेत बसवणार व लोकसभेतही खासदार म्हणून बसवणारच, असा निर्धार राज ठाकरेंनी केला आहे. फक्त तुमचे विचार पॉझिटीव्ह ठेवा. वाद करू नका. नाक्यानाक्यावरं झेंडे लागले पाहिजेत. पुढील पाच महिने रात्रभर काम केलं पाहिजे. लोकांना तुम्ही जोपर्यंत कवेत घेणार नाही. तोपर्यंत लोकं तुम्हाला कवेत घेणार नाहीत. तुम्हांला विजयापर्यंत कसं घेऊन जायचं ती जबाबदारी माझी आहे. मला पूर्ण विश्वास आहे आपण सत्तेत पोहचू, असे मोठे विधान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार मी स्वतः बसणार नाही, असा टोलाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक लढवाणार का, यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, त्यावर अजून निर्णय झालेला नाही. ज्या ठिकाणी अशी घटना घडते तिथे आम्ही उमेदवार देत नाही. पाठिंबा कोणाला द्यायला हे ठरवू, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.