सातारा जिल्ह्यातील लंम्पी मृत जनावरांच्या पशुपालकांना मिळणार अर्थसहाय्य
प्रशांत जगताप, सातारा
सातारा जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या लंम्पी त्वचारोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आणि पशुपालकांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचा आदेश राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने काढला असून त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
लंम्पी त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा शेतकरी पशुपालकांनी वैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यावेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस-पाटील तसेच स्थानिक दोन नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करून घ्यावयाचा आहे.. या पंचनाम्यात पशुधनांचा मृत्यू लंम्पीमुळे झाला असल्याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
समितीने पंचनामाच्या आधारे खातरजमा करून संबंधित शेतकरी आणि पशुपालकांना अर्थसाहाय्य मिळण्यासाठी शिफारस करून 15 दिवसाच्या आत संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यात अर्थसहायाची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करावी. दुधाळ जनावरे गाय आणि म्हैससाठी प्रत्येकी 30 हजार रुपये. बैल 25 हजार रुपये. वासरे 16 हजार रुपये असे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.