Devendra Fadnavis : 'पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटनात देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य करणार'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 'महापर्यटन उत्सव - सोहळा महाराष्ट्राचा' (Maharashtra Tourism ) या भव्य सोहळ्यात प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमाच्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला सर्वोच्च स्थानावर नेण्याचा दृढ संकल्प शासनाने केला आहे. सातारा जिल्हा – शौर्य, पराक्रम आणि सर्जनशीलतेचा संगम आहे. कोकण, पश्चिम घाट, कोयना बॅकवॉटरसह राज्यातील अनेक भाग पर्यटनाच्या दृष्टीने अमूल्य आहेत. या स्थळांचे सौंदर्य देशी-विदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापर्यटन उत्सव उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.
यासोबतच मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पर्यटनात ₹100 कोटींची गुंतवणूक झाली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. त्यामुळे पर्यटन हे रोजगारनिर्मितीसाठी एक महत्त्वाचे क्षेत्र असून, स्थानिकांना अधिकारिता देण्याचे हे माध्यम ठरू शकते. सध्या महाराष्ट्र देशात पर्यटनाच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे, मात्र पुढील पाच वर्षांत राज्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सुविधा, स्थानिक संस्कृतीचा अनुभव आणि सुलभ माहिती देणे आवश्यक आहे.
पर्यटन विभागाने वर्षभराचे महोत्सवांचे कॅलेंडर तयार करावे, असे निर्देश देताना फडणवीस यांनी सांगितले की, पर्यटन पोर्टल्स, वेबसाईट्स अधिक इंटरॅक्टिव्ह व्हाव्यात, त्यात एआय आणि चॅटबॉट्सचा वापर व्हावा. 'वेव्ह्ज 2025' कार्यक्रमामुळे महाराष्ट्र क्रिएटर्स इकॉनॉमीचा केंद्रबिंदू बनेल. भारतीय संगीत, लोककला, लोकगीत यांना पर्यटनाच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळेल.कोयना बॅकवॉटरवरील निर्बंध हटवल्यामुळे पर्यटन विकासाची दिशा मोकळी झाली आहे. पुढील महापर्यटन उत्सव कोयनामध्ये होणार असून, पर्यटकांना जलक्रीडा आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येईल असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, राम शिंदे, उदय सामंत, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभुराज देसाई, आ. डॉ. अतुल भोसले यांच्यासह जपानच्या योशियो यामाशिता यांची उपस्थिती होती.