CM Devendra Fadanvis : ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार
राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा उपक्रम’चा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून, सर्वच विभागांनी या काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. याच उपक्रमाचा पुढील टप्पा ६ मे २०२५ पासून सुरु होऊन २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राबविण्यात येणार असून, त्या दिवसापर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात ‘विकसित भारत २०४७’च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे दीर्घकालीन व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार आणि मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, हा उपक्रम केवळ प्रयोग नव्हता, तर शासनाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवणारा टप्पा होता. लोकाभिमुखता, कामकाजातील सुलभता आणि उत्तरदायित्व या तीन प्रमुख तत्वांवर प्रशासनाचे भवितव्य ठरवले जाणार आहे. राज्यातील १२,५०० कार्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि ४८ विभागांनी स्वमूल्यांकन पद्धतीने आपली कामगिरी सादर केली.
पुढील १५० दिवसांत प्रशासनात अधिक सुलभता आणण्यासाठी 'Ease of Living', 'Ease of Doing Business' आणि 'G2G – Ease of Working' या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजनमध्ये १६ महत्त्वाच्या विभागांचा समावेश असेल. कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, मानवी संसाधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करून त्यासाठीची दिशा ठरवली जाईल. हे व्हिजन तीन टप्प्यात – २०२९, २०३५ आणि २०४७ मध्ये साकार करण्यात येणार आहे.