Ladki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय,  जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यसरकारच्या लाडक्या बहीण योजनेला महाराष्ट्रातील लाखो स्त्रियांचा मोठा प्रतिसाद लाभला. या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आज लाखो महिला थोड्या प्रमाणात का होईना आत्मनिर्भर बनल्या आहेत.अनेक महिलांनी आपले छोटे मोठे व्यवसायही स्थापन केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवा निर्णय घेत लाडक्या बहिणींना शून्य टक्के व्याजदराने 1 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई बँककडून हे कर्ज दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकार दरवेळी नवनवीन योजना आमलात आणत असते. राज्यातील स्त्रियांना त्यांचा व्यवसाय उभा करता यावा आणि आर्थिक क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी यासाठी याआधीही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 9 टक्के व्याजदराने कर्ज दिले जात होते. मात्र त्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता तब्बल शून्य टक्के व्याज दराने हे कर्ज महिलांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

या योजनेअंतर्गत एका महिलेपासून ते 5 ते 10 महिलांनी एकत्र येऊन ही व्यवसाय करता येणार आहे. यासंदर्भात महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांचे व्यवसाय आणि त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे तपासली जातील आणि त्यानंतरच त्या महिलांना कर्ज मंजूर केले जाणार आहे. या कर्जावरील व्याजाचा परतावा हा शासनाच्या चार महामंडळाच्या योजनेमार्फत दिला जाणार असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या-विमुक्तांसाठीचं महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा यामध्ये समावेश असून याद्वारे महिलांचे कर्जावरील व्याज हे परत केले जाणार आहे. ज्या महिलांना कर्जपुरवठा केला जाणार आहे त्या महिला या महामंडळाच्या योजनेअंतर्गत येत असतील तर त्यांना त्यांच्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळणार आहे. असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून यामुळे आता लाडक्या बहिणी अधिक आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com