Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी
राज्यातील तरुणांनी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. राज्य सरकारने पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई पदांसह एकूण १५ हजार ६३१ पदांच्या भरतीसाठी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे हजारो तरुणांचे पोलीस दलात सामील होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीबाबतची चर्चा राज्यभर सुरू होती. तरुण-तरुणींनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरु केली होती, मात्र भरती प्रक्रिया नेमकी कधी राबवली जाणार याबाबत संभ्रम होता. अखेर सरकारच्या निर्णयानंतर या भरतीची दारे अधिकृतपणे खुली झाली आहेत.
नेमके किती पदे रिक्त?
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ पासून रिक्त असलेली सर्व पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई यांसारख्या महत्वाच्या पदांचा समावेश आहे. ही भरती शंभर टक्के रिक्त पदे भरण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणार आहे.
ऑगस्टमध्ये मिळाली होती तत्त्वतः मान्यता
याआधी १२ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतरची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अखेर शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
पुढे काय?
लवकरच या भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक व नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर लक्ष ठेवून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील हजारो तरुण पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहत असून, या भरतीमुळे त्यांच्या करिअरला नवे वळण मिळणार आहे. त्यामुळे तरुणाईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.