Devendra Fadnavis : महाराष्ट्र नक्षलवादांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य, म्हणाले की...
(Devendra Fadnavis) केंद्र सरकारने 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला आहे, आणि महाराष्ट्र या उद्दिष्टाच्या साध्यतेसाठी एक पाऊल पुढे आहे. राज्य शासनाच्या धोरणांमुळे आणि पोलिसांच्या कडक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या मार्गावर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील नक्षलवादाला संपवण्यासाठी अतिदुर्गम भागांमध्ये पोलीस चौक्यांची स्थापना करणे आवश्यक आहे. प्रत्येक चौकीत आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा देऊन त्याठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रम आयोजित करावेत. यामध्ये शासकीय योजनांचा लाभ स्थानिकांना देणे, रोजगार निर्माण करणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृती आराखड्याच्या संदर्भात एक समितीची बैठक झाली. यामध्ये त्यांनी नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणासाठी पोलीसांचे कौतुक केले आणि गडचिरोली पोलिसांना 1 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. तसेच, गडचिरोलीत नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय बांधण्याचे निर्देश दिले.
नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात 2009 मध्ये केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या १७ पोलीस जवानांच्या स्मरणार्थ, त्या भागात पोलिसांनी नवीन चौकी सुरू केली आहे, जे स्थानिकांच्या विश्वासाला चालना देत आहे.
तसेच, गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 17.30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची निर्मिती आणि 271 मोबाईल टॉवर्सची स्थापना करण्यात आली आहे. 2023 ते 25 दरम्यान 521 नवीन मोबाईल टॉवर्सही उभारले जाणार आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

