महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर नाना पटोले यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "जागावाटप..."
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून सर्वच राजकीय पक्षांचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नाहीय. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकांच्या माध्यमातून खलबते सुरु आहेत. अशातच आज झालेल्या महविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधून जागावाटपाबाबत मोठं विधान केलं. "आमची मित्रपक्षांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनाही आघाडीत सहभागी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतहील चर्चा सुरु आहे. दोन दिवसांनंतर आम्ही जागांबाबत अंतिम निर्णय जाहीर करू", असं पटोले म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले, जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे दोन दिवस लागतील. मित्रपक्षाच्या अडचणीही आम्हाला समजून घ्यायच्या आहेत, त्यामुळे एक-दोन दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल. लोकसभेची अंतिम यादी ज्यावेळी जाहीर होईल, तेव्हा उमेदवारांबद्दल समजेल. तुम्हाला दिल्लीत जायची इच्छा आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना पटोले म्हणाले, पक्षाच्या आदेशाचं पालन करावं लागतं.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिला टप्पा १९ एप्रिलपासून सुरु होणार असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु, काही मतदारसंघात जागावाटपाचा तिढा कायम असल्याने युती आणि आघाडीत बिघाडी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांना पत्रव्यवहार करून वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. तसंच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) वंचितच्या जागांबाबत सकारात्मक नसल्याचेही आंबडेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.