Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaLadki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय; ई-केवायसी चुका दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश

राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली. परिणामी, अनेक पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही.

या संदर्भात राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी चुकीमुळे पूर्ण झाली नाही, त्यांची क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठा असंतोष पाहायला मिळाला. अनेक महिलांना गेल्या काही काळापासून हप्ता मिळत नसल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. वारंवार विनंती करूनही भेट न मिळाल्याने संतप्त महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालून जोरदार निषेध व्यक्त केला.

या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, शासनाच्या नव्या सूचनांमुळे आता लाभार्थी महिलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रियेमुळे पात्र महिलांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com