Sunetra Pawar : ‘सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा’; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रस्ताव
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा यांसारखी अत्यंत महत्त्वाची खाती होती. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महायुती सरकारसमोर प्रशासकीय आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाबाबत आणि मंत्रिपदांच्या पुनर्वाटपाबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, ‘सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे’ असा ठाम प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवण्याची तयारी केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष आणि कुटुंब दोन्हीवर आलेल्या संकटाच्या काळात सुनेत्रा पवार यांनी संयम आणि ताकद दाखवली असून, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक
या प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खाती कोणाकडे सोपवायची, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वजन कायम ठेवण्यासाठी ही पदे पक्षाकडेच राहावीत, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून धरला जात असल्याचे समजते.
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आघाडीवर
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबतही महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. सध्या पक्षाचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव पक्षातील नेत्यांकडून पुढे येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्तरावर पक्षाला मजबूत नेतृत्वाची गरज असल्याने प्रफुल पटेल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असा सूर राष्ट्रवादीत उमटताना दिसत आहे.
विलिनीकरणाऐवजी स्वतंत्र अस्तित्वाची भूमिका
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असली तरी, आता अजित पवार यांच्या पक्षातील अनेक नेते स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार हयात असताना विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती, मात्र त्यावर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वेगळी चूल ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
सुनेत्रा पवार यांच्याशी झालेली अंतर्गत चर्चा
अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानमध्ये अंतिम निरोप दिल्यानंतर त्यांच्या सहयोग बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीला पार्थ पवारही उपस्थित होते. या वेळी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, तर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असा प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती आहे. आता या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकार कोणता अंतिम निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
