Manoj Jarange Patil: "...तर मग त्याचे परिमाणा भोगावे लागतील"; मनोज जरांगे पाटील यांचा विरोधकांना इशारा
Manoj Jarange Patil Press Conference : मराठ्यांना न्याय मिळणार. आमच्या मागण्यांप्रमाणे आमची सर्व कामे होणार, याची आम्हाला खात्री आहे. आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे. ओबीसी आरक्षण मराठ्याला द्यायचं झालं तर, २०१२ चा कायदा दुरुस्त करावा लागतो. आताची सुधारणा करून त्याला २०२४ च्या कायद्यानं नाव द्यावं लागेल. त्यामुळे अधिसुचनेशिवाय पर्याय नाही. अंमलबजावणीच्या बाबतीत दोघांमध्ये दुमत दिसत आहे. सरकारने हरकती बघायच्या की नाहीत? ते सरकारच्या हातात असतं. पण तुम्ही छगन भुजबळ यांच्यासारखच मराठ्यांवर अन्याय करू लागले, तर मग त्याचे परिमाणा भोगावे लागतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, १३ तारखेपर्यंत शंभुराजे साहेबांवर विश्वास ठेवला आहे. मराठ्यांना किती न्याय देतात की, छगन भुजबळ यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करतात, ते पाहुया. यांना जनतेबद्दल कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नाही. सत्ताधारी असो की विरोधत, यांना गोरगरिबांशी घेणंदेणं नाही. मग तो ओबीसी असो किंवा मराठा बांधव असो. मराठ्यांचं चांगलं होवो की वाईट होवो, यांना याबाबत गांभीर्यच नाही. पण यावेळी सर्वांना धडा मिळणार आहे. वेळेवर सर्वकाही व्यवस्थित होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीला आमच्या जीवावर राजकीय पोळ्या भाजायच्या असल्या, तरीही महाराष्ट्र पेटता राहणार नाही. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कधीच वाद होणार नाही. भुजबळ जातीवाद पसरवत आहेत.
मुंबईत काल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सगेसोयऱ्यांना ओबीसींच्या नेत्यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते आम्हाला विरोध करतील, याची कल्पना आम्हाला होती. ते आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका मांडतील, अशी आम्हाला आशाच नाही. ओबीसीचे नेते विरोधच करणार आहेत. ते आम्हाला पक्क माहित आहे. ४० वर्षापासून आरक्षणाचा लढा सुरु आहे, तेव्हापासून ते विरोधच करत आहेत. त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. त्यांना सरकार चालवायचं आहे म्हटल्यावर त्यांना या गोष्टी ऐकूनच घ्याव्या लागणार आहेत. त्याचा अर्थ असा नाही की, मराठ्यांना दगा फटका होईल, असंही जरांगे म्हणाले.