Jarange Patil : जरांगे पाटील आक्रमक, देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप!

Jarange Patil : जरांगे पाटील आक्रमक, देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप!

मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
Published by :
shweta walge

मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही देवेंद्र फडणवीस असल्याचा दावा त्यांनी केला.यावेळी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेबरोबरच भाजपातील काही नेत्यांचीही नावं घेतली.

काय म्हणाले जरांगे पाटील?

देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण मिळू दिलं नसल्याचा दावा करत आपण आता थेट सागर बंगल्यावर दाद मागण्यासाठी जात असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. तसेच, “माझा जीव घ्यायचा असेल तर घ्या, मी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मला संपवण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सगेसोयऱ्याचे आरक्षण देऊ देत नाही. त्यांनी पक्षातील लोकांना संपवले आहे. ते कोणाला मोठे होऊ देत नाही. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा आता चालणार नाही, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना शिविगाळ केली. त्यानंतर समाजातील लोक व्यासपीठावर येऊन त्यांची समजून घालू लागले. त्यांना शांत केले. या प्रकारानंतर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे येण्यास निघाले आहेत.

“मी ब्राह्मण आहे आणि मी मराठ्यांना हरवून दाखवेन असं फडणवीसांना वाटतं. मी आजपर्यंत त्यांना जातीवरून कधीच बोललो नाही. त्यांचं जर कुणी ऐकलं नाही, तर ते माणसं संपवतात. त्यांचं जो ऐकणार नाही, तो संपतो. त्यांना इतर कुणी पुढे गेलेलं खपत नाही. एखादी जात मोठी झालेली चालत नाही. त्यांची गुलाम होऊन ऐकणारी जात त्यांना लागते. त्यामुळेच मला बदनाम करून संपवण्याचा कट आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांची नावं घेतली. “एकनाथ खडसे कधीच भाजपा सोडू शकत नव्हते. त्यांच्यावर सोडायची वेळ आली. विनोद तावडे कधीच महाराष्ट्रातून बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांना दिल्लीला जावं लागलं. नाना पटोले कधीच भाजपा सोडू शकत नव्हते, त्यांना जावं लागलं. पंकजा मुंडे, त्यांचे वडील आणि मामा आयुष्यात भाजपा सोडू शकत नाहीत. आज त्यांची अवस्था काय आहे. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही, त्यांनाही फडणवीसांमुळे पक्ष सोडावे लागलेत. ज्यांची नावं आली आहेत, त्यांनी शांतपणे फक्त मान हलवून तरी मान्य करावं”, असं जरांगे पाटील म्हणाले.

“महादेव जानकरांना ते कधीच धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देणार नाहीत. जीव गेला तरी प्रफुल्ल पटेल आयुष्यात राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते. पण तुरुंगाचा एवढा धाक दाखवला की त्यांना ते करावं लागलं. अजित पवार कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नव्हते. पण नाईलाज इतका केला, की तुरुंगात जाण्यापेक्षा यांच्यासोबत गेलेलं बरं म्हणत तेही गेले”, असा दावा जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

“छगन भुजबळ कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नव्हते. अजित पवारांचं आणि त्यांचं जमतही नाही. त्यामुळे ते दोघं एका बाजूला होऊच शकत नाहीत. पण फडणवीस तुरुंगात टाकतील म्हणून अजित पवारांशी पटत नसूनही त्यांच्यासोबत जावं लागलं. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नव्हते. नाईलाजानं त्यांना हे सगळं करावं लागलं. अशोक चव्हाणांच्या घरात तीन वेळा मुख्यमंत्रीपद दिलं आहे. ते कधीच काँग्रेस सोडू शकत नव्हते, पण जावं लागलं”, असं म्हणत मनोज जरांगेंनी अशोक चव्हाणांचाही उल्लेख केला.

“सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींमध्ये मतभेद निर्माण केले आणि त्यांना बाजूला केलं. तेच रविकांत तुपकरांच्या बाबतीतही केलं. जे यांच्याकडे कधीच येऊ शकत नव्हते, ते आले. सुनील तटकरेंची उभी हयात राष्ट्रवादीत मोठी झाली, त्या माणसाला एका रात्रीत यांच्याकडे जावं लागलं. धनंजय मुंडेंनी एकदाच आवाज उठवला होता. फडणवीसांनी एकदाच म्हटलं की तुझं सगळं काढू का? तेव्हापासून आजतागायत धनंजय मुंडे काही बोलले नाहीत”, असंही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com