Marathwada Water Issue
Marathwada Water Issue

Marathwada Water Issue : ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच, 268 गावांना टँकरची गरज

मराठवाड्यात पावसाने जोर धरला असला, तरी अनेक भागांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Marathwada Water Issue ) मराठवाड्यात पावसाने जोर धरला असला, तरी अनेक भागांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम असून, शेकडो गावे अद्यापही टँकरवर अवलंबून आहेत. गुरुवार सकाळपर्यंत मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील 57 मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, इतर जिल्ह्यांमध्ये रिमझिम व संततधार पाऊस सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 40 मंडळांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली असून, हिंगोलीत 9, छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 आणि जालना जिल्ह्यात 3 मंडळांमध्ये मुसळधार पावसाचा अनुभव आला. गेल्या दोन दिवसांपासून विभागात ढगाळ वातावरण आहे. सध्या मराठवाड्यात 26 मिमी सरासरी पाऊस झाला आहे, तर विभागाची वार्षिक सरासरी 679 मिमी आहे. त्यामुळे अजूनही समाधानकारक पर्जन्यमान झालेलं नाही.

पाऊस पडत असला तरी मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जून महिना संपत आला तरीही 268 गावे आणि वाड्यांमध्ये 424 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 148 गावांमध्ये आणि 23 वाड्यांमध्ये एकूण 228 टँकर सुरू आहेत. जालना जिल्ह्यात 109 गावे आणि 23 वाड्यांमध्ये 181 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यात 8, हिंगोलीत 2 आणि नांदेडमध्ये 5 टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

दरम्यान, विभागातील जायकवाडीसह 11 मोठ्या प्रकल्प व बंधाऱ्यांमध्ये सध्या 28 टक्के जलसाठा असून, जायकवाडीत एकट्या यंदाच्या पावसाळ्यात 39.75 दलघमी पाणी आले आहे. हे प्रमाण समाधानकारक नसले तरी खरीप हंगामासाठी काहीसा दिलासा मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com