"फडणवीसांनी आता नारायण राणेंना रस्त्यावर आणलंय", आमदार वैभव नाईकांचा राणेंवर 'प्रहार'
देवेंद्र फडणवीस मागे लागले होते, म्हणून मी भारतीय जनता पक्षात आलो, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर शाब्दिक प्रहार केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार राहणार नाही. मते न मिळाल्यास विकासनिधी देणार नाही. सरपंचांना अशी धमकी देणे, ही नितेश राणेंची जुनीच परंपरा आहे. नारायण राणेंना देवेंद्र फडवणीस हे रस्त्यात भेटत होते. त्यावेळी त्यांनी राणेंना भाजपात प्रवेश करण्यास सांगितलं. त्याच फडणवीसांनी आता राणेंना रस्त्यावर आणलं आहे. असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
वैभव नाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नितेश राणे आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशेब घेऊन बसणार आहेत. सुदन बांदिवडेकर यांची बोटे कोणी छाटली ? बाळा वळंजू यांचा मृत्यू मुंबईत कसा झाला? याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावा. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही. मते न मिळाल्यास विकासनिधी देणार नाही, अशा धमक्या राणे देतात.
नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात सलगी वाढलीय. त्यामुळे राजन तेलींना बाजूला टाकण्याचे काम पद्धतशीरपणे सुरु आहे. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तेलींना बाजूला करण्यात आलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणेंना तिकिट मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. विनायक राऊत यांच्याविरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही. त्यामुळे भाजप कोणाला तरी बळीचा बकरा बनवत आहे, अशी टीकाही नाईक यांनी केली.