MNS On Kapil Sharma : "मुंबई ऐवजी बॉम्बे..." कपिल शर्माला मनसेचा इशारा
MNS On Kapil Sharma : "मुंबई ऐवजी बॉम्बे..." कपिल शर्माला मनसेचा इशारा MNS On Kapil Sharma : "मुंबई ऐवजी बॉम्बे..." कपिल शर्माला मनसेचा इशारा

MNS On Kapil Sharma : "मुंबई ऐवजी बॉम्बे..." कपिल शर्माला मनसेचा इशारा

मनसेचा इशारा: कपिल शर्माच्या शोमध्ये 'बॉम्बे'चा उल्लेख थांबवा, अन्यथा आंदोलनाची धमकी.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

कॉमेडियन कपिल शर्मा मनसेच्या रडारवर

बॉलिवूडकडून अजूनही मुंबईचा बॉम्बे उल्लेख

मान राखा, मुंबईच म्हणा...मनसेचा कपिल शर्माला इशारा

MNS On Kapil Sharma : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांनी सजलेल्या, सामर्थ्याच्या प्रतीक असलेल्या या महाराष्ट्रात ‘मुंबई’ या नावाला वेगळंच महत्त्व आहे. हे नाव केवळ शहराचं नाही, तर असंख्य मराठी माणसांच्या ओळखीचं प्रतीक आहे. 1995 मध्ये राज्य शासनाने आणि 1996 मध्ये केंद्र शासनाने ‘बॉम्बे’ऐवजी ‘मुंबई’ हे अधिकृत नामकरण करून या शहराच्या आत्मसन्मानाला योग्य न्याय दिला. पण आज तीस वर्षांनंतरही या नावाचा आदर राखला जात नाही, हे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर आक्रमक झाले आहेत.

नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या लोकप्रिय कार्यक्रमात सतत ‘बॉम्बे’ हा शब्द वापरला जात असल्याने खोपकरांनी थेट कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याच्या टीमला इशारा दिला आहे. "मुंबई ऐवजी बॉम्बे असा उल्लेख थांबवा, अन्यथा आम्ही थेट सेटवर आंदोलन करु आणि शूटिंग रोखू," असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

अमेय खोपकर यांनी एक्स (माजी ट्विटर) वर कपिलच्या शोचा एक क्लिप शेअर करत या मुद्याला वाचा फोडली. "बॉम्बेचे मुंबई नामकरण होऊन तीन दशके झाली, तरी हिंदी चित्रपटसृष्टीत आणि वेब सिरीजमध्ये अजूनही बॉम्बेचा वापर केला जातो. चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता यांची नावं नीट घेतली जातात, मग मुंबईला कमी लेखायचं का? मुंबई म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे, त्यामुळे तिच्या नावाचा मान राखलाच पाहिजे," असे खोपकर म्हणाले.

माध्यमांशी बोलताना त्यांनी संतापाने प्रश्नही केला – "कपिल गेल्या 15-17 वर्षांपासून मुंबईत राहतोय, तरी त्याला अजून शहराचं नाव नीट घेता येत नाही का? त्याला कपिलऐवजी टपिल म्हणालं तर चालेल का?" त्याचबरोबर, "आम्ही कपिल शर्मा किंवा बॉलिवूडच्या विरोधात नाही, पण मुंबईच्या नावाशी कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

आता या इशाऱ्यावर कपिल शर्मा किंवा त्याच्या टीमची काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण, फक्त एका विनोदी शो मधला उच्चार नव्हे, तर हा मुद्दा मुंबईच्या सन्मानाचा आहे. नाव हे ओळखीचं प्रतीक असतं, आणि त्यातला ‘मुंबई’चा अभिमान जपणे, ही जबाबदारी इथं राहणाऱ्या प्रत्येकावर आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com