Jalgaon : मुंबई विमानसेवा आता दररोज; अहमदाबाद उड्डाणही लवकरच सुरू
जळगावकरांसाठी प्रवासाचा मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जळगाव विमानतळावरून चालणारी जळगाव–मुंबई विमानसेवा, जी यापूर्वी आठवड्यात केवळ चार दिवस उपलब्ध होती, ती आता प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दररोज सुरू करण्यात आली आहे. यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच आसपासच्या भागातील नागरिकांना अवघ्या दीड तासात मुंबई गाठणे सहज शक्य होणार आहे.
अलायन्स एअरमार्फत ही सेवा चालवली जात असून, व्यावसायिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि वैयक्तिक कारणांसाठी मुंबईत सतत जाण्या-येण्याची गरज असणाऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय काही महिन्यांपासून बंद असलेली जळगाव–अहमदाबाद विमानसेवा देखील लवकरच पुन्हा सुरू होण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे दोन प्रमुख महानगरांशी जळगावची कनेक्टिव्हिटी अधिक सुदृढ होणार आहे.
नवीन हिवाळी वेळापत्रकानुसार, मुंबई–जळगाव–मुंबई सेवेतही वेळेत बदल करण्यात आले आहेत. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी विमान रात्री ८:०० वाजता मुंबईहून जळगावला येईल आणि रात्री ८:३५ वाजता पुन्हा मुंबईकडे परतेल. तर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी विमान दुपारी ४:२० वाजता मुंबईहून उड्डाण घेऊन जळगावात येईल आणि त्यानंतर दुपारी ४:४५ वाजता अहमदाबादसाठी रवाना होईल.
या नव्या बदलांमुळे जळगाव विमानतळाचे महत्त्व आणखी वाढणार असून, जलद व आरामदायी प्रवासाचा उत्तम पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. आगामी काळात पर्यटन, गुंतवणूक आणि व्यापार क्षेत्रातही या सुविधेमुळे सकारात्मक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

