Murlidhar Mohol : उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्याआधी मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, घरामध्ये कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कुठलीही इतर पार्श्वभूमी नाही. तरीसुद्धा सर्वसामान्य बूथ प्रमुख, कार्यकर्ता हा पुण्यासारख्या शहराचा लोकसभेचा उमेदवार होतो. मला असं वाटते की, माझ्या सर्व पक्षाच्या सर्व नेतृत्वाला मला धन्यवाद दिले पाहिजे. एका कार्यकर्त्याला न्याय कसा मिळतो हे या पक्षात आपण पाहू शकता.
यासोबतच मोहोळ पुढे म्हणाले की, आज उमेदवारी अर्ज भरायला निघताना घरातल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन निघालो आहे. पुणेकरांना मी हेच आव्हान करेन की, गेल्या 10 वर्षात देशामध्ये शेवटी देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीतून प्रधानमंत्री कोण होणार? देशाचं नेतृत्व कोण करणार? सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची हे जनता ठरवणार आहे. त्यामुळे पुणेकर जनतेला हे आव्हान करीन की मागच्या 10 वर्षाचे एकूण मोदी सरकारचे काम पुण्यासाठीचं अनेक प्रकल्प योजनेच्या माध्यमातून योगदान. शेवटी हा ही विचार पुणेकर करणार आहेत. मागच्या काही काळामध्ये नेमकं पुण्यासाठी कुणी काय केलं? आणि भविष्यामधलं पुणे कुणाच्या हातात सुरक्षित राहिल, या पुण्याची प्रगती कोण करु शकेल? तर ते निश्चितपणे मोदी सरकारच्या माध्यमातूनच होईल. त्यासाठी एक प्रतिनिधी आमच्या पुण्याचा म्हणून पुणेकर निश्चितपणे माझ्या पाठिशी आहेत, मला आशीर्वाद देतील. असा मला विश्वास वाटतो. आम्हाला विजयाची निश्चितपणे खात्री आहे. असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.