Nana Patole Press Conference
Nana Patole Lokshahi

नाना पटोलेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा; म्हणाले, "महाराष्ट्रातल्या हजारो कोटी रुपयांच्या जमिनी..."

"महाराष्ट्र झोपला होता, तेव्हा पहाटे त्यांनी सरकार बनवलं होतं. त्यावेळी फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात झालं आणि पार्टीचं सरकार त्यांनी बनवलं. शाहू-फुले आंबेडकरांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं"
Published by :
Naresh Shende
Published on

Nana Patole Press Conference: अदानीला महाराष्ट्राच्या जमिनी विकत देताना आम्हाला विचारता का? शेतकरी विरोधी धोरण निर्माण करता, त्यावेळी आम्हाला विचारून असा निर्णय घेता का? महाराष्ट्रातील बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची व्यवस्था तुम्ही करत आहात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही देत का नाहीत? महाराष्ट्रातल्या हजारो कोटी रुपयांच्या जमिनी गुजरातच्या नेत्याच्या इशाऱ्यावर दिल्या जातात. महाराष्ट्र लुटला जातोय. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जातात. त्यावेळी आमच्याशी चर्चा करता का? याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. तुम्ही सत्तेचं जे काही सुख भोगलं, आरक्षणाबाबत जी काही आश्वासनं तुम्ही दिलीत, त्याची पूर्तता तुम्हाला करायची आहे. हे प्रश्न दुसऱ्यावर झटकण्याचं काम करायचं नाही, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले, ते चुकीचा इतिहास सांगण्यात एक्सपर्ट आहेत. २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळीच मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं होतं. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस टीकवू शकले नाहीत. २०१४ मध्ये या लोकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली होती की, आमचं सरकार राज्यात आणि देशात निवडून द्या. मराठ्यांना, धनगरांना आरक्षण देतो, अशा घोषणा त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. २०१४ ते २०१९ केंद्रात आणि राज्यात सरकार होतं. २०१९ मध्ये पुन्हा केंद्रात त्यांचं सरकार आलं. तसच सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप महाराष्ट्रात निवडून आला.

महाराष्ट्र झोपला होता, तेव्हा पहाटे त्यांनी सरकार बनवलं होतं. त्यावेळी फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात झालं आणि पार्टीचं सरकार त्यांनी बनवलं. शाहू-फुले आंबेडकरांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं. महाराष्ट्रात मागच्या काळात भाजपला जनतेनं १०५ आमदार निवडून दिले होते. पण त्यावेळी चूक झाली असं जनतेला वाटत आहे. संवेधिनिक व्यवस्थेलाच काळीमा फासण्याचं काम भाजपने केलं. देवेंद्र फडणवीस पुण्यात म्हणाले, विरोधकांनी भूमिका मांडावी, पण राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे. तुम्ही आरक्षण द्या. तुम्हाला कुणी थांबवलं आहे? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com