नाना पटोलेंच्या कारला अपघात; अपघातानंतर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. लोकसभा निवडणुकीचं काम आटपून जात असताना नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. कारला धडक बसली तेव्हा कारमधील सर्वजण खाली उतरल्याने कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जाताना भिलेवाडा जवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. ट्रकचालकाने मुद्दामहून माझ्या वाहनाला कट मारला. या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? याची चौकशी आता पोलीस करतील. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम व परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे. काळजी नसावी, असं पटोले यांनी म्हटलं आहे.