Maharashtra Politics : राष्ट्रवादी एकत्र मैदानात! वादग्रस्त जागांचा तिढा अखेर सुटला

Maharashtra Politics : राष्ट्रवादी एकत्र मैदानात! वादग्रस्त जागांचा तिढा अखेर सुटला

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील वादग्रस्त जागांवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील वादग्रस्त जागांवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोपचाराने तोडगा काढण्यात आल्याची माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे. या बैठकीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय पेच मिटल्याचे मानले जात आहे.

अंकुश काकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमधील जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली असून वादग्रस्त ठरलेल्या जागांवर सामंजस्याने निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक वातावरणात चर्चा झाली आणि कोणताही वाद न ठेवता तोडगा काढण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रमही दूर झाला आहे.

काकडे यांनी पुढे सांगितले की, “दुपारी तीन वाजल्यानंतर आमच्या वाट्याला येणाऱ्या जागांची संख्या स्पष्ट होईल.” सध्या अंतिम आकडेवारीवर काम सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. या निर्णयामुळे निवडणूक तयारीला वेग येणार असून, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे निवडणूक रणांगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून एकूण १६५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये महापालिका, नगरपरिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा समावेश असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून निर्माण झालेला तणाव हा कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. मात्र आता हा तिढा सुटल्यामुळे पक्षातील वातावरण पुन्हा एकदा निवडणूक-केंद्रित झाले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे यांनी या बैठकीला महत्त्वाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या हिताला प्राधान्य देत सर्व निर्णय घेण्यात आले असून, कुठेही अहंकाराला थारा दिला गेलेला नाही. समन्वय आणि सहकार्याच्या भूमिकेतूनच हा तोडगा निघाला आहे.

दरम्यान, या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत १६५ जागांवर लढणार असल्याने इतर पक्षांसमोर आव्हान उभे राहणार आहे. आता दुपारी तीननंतर जागांची अंतिम संख्या स्पष्ट झाल्यानंतर पुढील रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com