नवनीत राणांवर बच्चू कडूंचा 'प्रहार'; म्हणाले, "कितीवेळा रडणार तुम्ही, निवडणुकीत रडणं म्हणजे..."
न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा भावुक झाल्या होत्या. न्यायालयाने जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा दिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राणा भावुक झाल्या होत्या. गेली दहा-बारा वर्ष आपण खूप काही सोसलं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. रडणं म्हणजे सहानुभूती घेणं आहे. पण आता सहानुभूती संपली आहे. कितीदा रडणार तुम्ही. निवडणुकीत रडणं चांगलं नसतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांची खिल्ली उडवली.
माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, जनतेचं उत्तर वेगळं आहे. जनतेच्या न्यायालयात त्यांचा पराभव होणार आहे. रडणं म्हणजे सहानुभूती घेणं आहे. पण आता सहानुभूती संपली आहे. कितीदा रडणार तुम्ही. निवडणुकीत रडणं चांगलं नसतं. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असत्या, तर आम्हाला तुमची दया वाटली असती. तुम्ही उमेदवारीसाठी रडत आहात, हीच मोठी दुर्देवी गोष्ट आहे.