Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCPSharad Pawar NCP

Sharad Pawar NCP : मोठी बातमी! शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बडा नेत्याचा अचानक दिला राजीनामा,नेमकं कारण काय?

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक जवळ येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक जवळ येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील एक महत्त्वाचा आणि प्रभावी युवा चेहरा बाजूला झाल्याने या निर्णयाचा थेट परिणाम निवडणूक समीकरणांवर होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सलील देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “गेल्या सहा महिन्यांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने मी सक्रिय राजकारणापासून दूर राहिलो आहे. पुढील काळात आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

राजीनाम्यानंतर लगेचच सलील देशमुख दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार का, असा प्रश्नही उपस्थित झाला. मात्र त्यांनी तात्काळ यावर स्पष्टीकरण देत म्हणाले, “शरद पवारांनी आमच्या कुटुंबाला खूप मान-सन्मान दिला आहे. पक्षाने मला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मला कोणावरही नाराजी नाही. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न सध्या नाही. माझ्या प्रकृतीची काळजी घेऊन काही महिन्यांनी पुन्हा जोमाने लोकसेवेत उतरायचे आहे.”

यावरून सलील देशमुख राजकारणातून दूर जाण्याचा विचार करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट त्यांनी पुढील काळात लोकसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “मी केलेली विकासकामे, प्रकल्प आणि लोकांशी असलेला संवाद यावर पुढेही लक्ष देणार आहे,” असे ते म्हणाले.

मात्र त्यांच्या राजीनाम्याची टायमिंग सर्वांना विचारात पाडणारी ठरली आहे. राज्यातील निवडणूक चढाओढ वाढत असताना, आणि शरद पवारांचा गट नव्याने उभारी घेत असताना, सलील देशमुख यांच्यासारख्या प्रभावी नेत्याचा अचानक बाहेर पडणे हे पक्षासाठी निश्चितच धक्कादायक आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाचा अमरावती आणि विदर्भात मजबूत प्रभाव असल्याने, आगामी निवडणुकीत या राजीनाम्याचा परिणाम जाणवू शकतो.

राजीनामा दिल्यानंतर सलील देशमुख यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्यांचा निर्णय पूर्णपणे आरोग्याच्या कारणावर आधारित आहे आणि त्यात राजकीय मतभेद किंवा नाराजीचा कोणताही भाग नाही. तरीही त्यांच्या पुढील राजकीय पावलांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी ते विश्रांती घेण्याच्या भूमिकेत असले तरी, त्यांच्या पुनरागमनाची वेळ आणि दिशा कोणती असेल, हा राज्यातील आगामी राजकारणातील मोठा प्रश्न ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com