Gateway Of India Jetty Project : गेटवे जवळ नवी जेट्टी, ऑगस्टपासून प्रवाशांसाठी खुली होणार
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात उभारली जात असलेली आधुनिक प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पावसाळ्यानंतर, म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सुमारे 229 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या जेट्टीला सुरुवातीपासूनच स्थानिक नागरिक आणि पर्यावरण अभ्यासकांचा विरोध होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला परवानगी दिली आहे.
अलीबाग आणि आसपासच्या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने कुलाबा परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, पर्यटन वाढवणे आणि प्रवास अधिक सुरक्षित करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी लाखो प्रवासी सध्या जुन्या जेट्टींचा वापर करतात, त्यामुळे आधुनिक सुविधांची गरज होती.
जरी या प्रकल्पामुळे गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूवर परिणाम होईल, तसेच सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली असली तरी न्यायालयाने या आक्षेपांना नकार दिला आहे. मूळतः मे महिन्यात सुरू होणारी ही जेट्टी आता पावसाळ्यामुळे उशिरा सुरू होणार असून, ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
थोडक्यात
मुंबई – गेटवे ऑफ इंडिया परिसर.
आधुनिक प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल उभारणी.
आता अंतिम टप्प्यात.
पावसाळ्यानंतर, म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.

