Nagarparishad-Nagarpanchayat Election Result : कोकणात नितेश राणे विरूद्ध निलेश राणे...
कोकणाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून तापलेलं वातावरण आज निकालामुळे शिगेला पोहोचणार आहे. राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालासाठी आज (21 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली.असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये केवळ पक्षांमध्येच नव्हे, तर काही ठिकाणी एकाच घरातील नेत्यांमध्ये थेट सामना रंगला आहे. तळकोकणात विशेषतः राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागल्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष या भागाकडे लागलं आहे.
राज्यात एकूण 287 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतींमध्ये भाजपचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने तिथे आधीच चित्र स्पष्ट आहे. मात्र इतर ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने निकाल चुरशीचे ठरण्याची चिन्हे आहेत.
तळकोकणात कणकवली नगरपंचायत, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषदांमध्ये पाच फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. भाजपने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दुसरीकडे मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले या दोन्ही ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांचं राजकीय भवितव्य आजच्या निकालावर अवलंबून आहे.
मालवणमध्ये निवडणूक काळात घडलेल्या ‘स्ट्रिंग ऑपरेशन’मुळे वातावरण अधिकच तापलं. भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटपाचा आरोप करत निलेश राणेंनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईसाठी दबाव टाकला. यानंतर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर जात प्रमाणपत्राबाबत आरोप करत प्रकरण न्यायालयात नेण्यात आलं. त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. याआधी उबाठा गटाचा नगराध्यक्ष असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. कणकवलीत मात्र चित्र वेगळं आहे.
नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात सर्वपक्षीय एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्यात आली. या आघाडीच्या माध्यमातून निलेश राणेंनी थेट आव्हान उभं केल्याने ‘राणे विरुद्ध राणे’ असा संघर्ष पाहायला मिळाला. सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये भाजपने दीपक केसरकरांना घेरण्याचा प्रयत्न केला असला, तरी या दोन्ही नगरपरिषदांमध्ये याआधी भाजपची सत्ता राहिली आहे. त्यामुळे आजचा निकाल केसरकरांची पकड कायम आहे की बदलाची चाहूल लागते, हे ठरवणार आहे. एकूणच, कोकणातील या निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात नवा संदेश जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता काही तासांतच स्पष्ट होईल, कोणाची बाजी, आणि कोणाचा धक्का.
