Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनी राजपथावर आता ‘व्हीआयपी’ नाही, १०,००० ‘खास’ पाहुण्यांना परेडचे निमंत्रण
देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा यंदा एक वेगळाच इतिहास रचणार आहे. नेहमी व्हीआयपी, राजकीय नेते आणि मान्यवरांनी भरलेली राजपथावरील गॅलरी यावर्षी मात्र देशाच्या ‘खऱ्या नायकांनी’ सजणार आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी तब्बल १०,००० विशेष पाहुण्यांना निमंत्रण दिले असून, या पाहुण्यांमध्ये शेतकरी, कामगार, शास्त्रज्ञ, स्टार्टअप उद्योजक, महिला स्वयंसहाय्यता गट सदस्य, क्रीडापटू आणि समाजाच्या तळागाळात काम करणारे नागरिक मोठ्या संख्येने असणार आहेत. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे—राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाला राष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान देणे. गेल्या काही वर्षांपासून सरकारी योजनांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात असून, यंदाही हीच परंपरा पुढे नेण्यात आली आहे. ‘लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून, ती रोजच्या मेहनतीतून घडते,’ हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
शास्त्रज्ञ, स्टार्टअप हिरो आणि क्रीडापटूंना मानाचा मुजरा
यंदाच्या पाहुण्यांच्या यादीत इस्रोच्या शास्त्रज्ञांना विशेष स्थान देण्यात आले आहे. गगनयान, चांद्रयानसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करून भारताला जागतिक पातळीवर मान मिळवून देणाऱ्या शास्त्रज्ञांना प्रजासत्ताक दिन परेडसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय, नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणारे तरुण स्टार्टअप उद्योजक देखील या सोहळ्याचा भाग असतील.जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचा झेंडा उंचावणारे क्रीडापटू, नैसर्गिक शेतीद्वारे जमिनीची सुपीकता वाढवणारे शेतकरी, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला यांनाही यंदा मानाचे स्थान देण्यात आले आहे.
व्हीआयपी संस्कृतीला पूर्णविराम
या वर्षी संरक्षण मंत्रालयाने व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलले आहे. परेड पाहण्यासाठी असलेल्या गॅलरींना आता कोणत्याही पदनामाऐवजी भारतातील पवित्र नद्यांची नावे देण्यात आली आहेत. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कावेरी, नर्मदा आणि सतलज अशा नावांच्या गॅलरींमधून प्रेक्षक परेडचा आनंद घेणार आहेत. हा बदल भारताच्या नैसर्गिक वारशाचा सन्मान तर करतोच, शिवाय समानतेचा संदेशही देतो.
परेडपश्चात दिल्ली दर्शन आणि मंत्र्यांशी संवाद
या १०,००० विशेष पाहुण्यांसाठी सरकारने परेडपुरताच नव्हे तर दिवसभराचा विशेष कार्यक्रम आखला आहे. परेडनंतर त्यांना दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवले जाईल. याशिवाय, एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची आणि स्वतःचे अनुभव मांडण्याची संधीही दिली जाणार आहे. सरकारचा विश्वास आहे की अशा उपक्रमांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेतला सहभाग वाढेल आणि देशाबद्दलचा अभिमान अधिक बळकट होईल. शांतपणे, निस्वार्थपणे देशासाठी काम करणाऱ्या मोठ्या आणि लहान नायकांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
