Chhatrapati Sambhajinagar: पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली उभे राहिले अन्
छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी आकाशातून कोसळलेल्या वीज कोसळली. विजेच्या या अचानक तडाख्यामुळे चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तसेच चार जनावरेही ठार झाली आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सारोळा शिवारात तिसरी आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गट क्रमांक 294 मध्ये वीज कोसळून रोहित राजू काकडे (वय 21) आणि यश राजू काकडे (वय 14) हे दोघे सख्खे भाऊ मृत्युमुखी पडले. पेरणीच्या कामासाठी शेतात गेलेले हे दोघे भाऊ पावसामुळे झाडाखाली थांबले असताना विजेचा तडाखा बसला आणि दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
चार जनावरेही ठार, शेतकऱ्यांना आर्थिक फटका
अन्वी शिवारातील गट क्रमांक 139 मध्ये वीज कोसळून नारायण सांडू बांबर्डे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. तर मांडणा गावात गट क्रमांक 295 मध्ये ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांची तीन वासरे ठार झाली. या जनावरांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा वाटा असल्यामुळे आर्थिक नुकसानही मोठे झाले आहे.
पावसाची हजेरी, पण संकटही ओढवले
मृग नक्षत्राच्या आगमनानंतर शेतकरी आनंदात होते. अजिंठा मंडळात 70 मिमी पावसाची नोंद झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शनिवारी आलेल्या वादळी पावसाने आणि विजेच्या तडाख्याने अनेक कुटुंबांवर दु:खाचे आभाळ कोसळले. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे शेतजमिनीही खरडून गेल्या असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.