Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; अखेर एक रुपयात पीक विमा योजना गुंडाळली
दोन वर्षे राज्यात सुरू असलेली एक रुपयात पीक विमा योजना आता अखेर राज्य सरकारने गुंडाळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली होती. त्यात या योजनेत घोटाळे झाल्याचे आरोप देखील करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पीक विमा योजनेतील बदलास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता पूर्वीप्रमाणेच पीक विम्यापोटी आपला हिस्सा भरावा लागणार आहे. एक रुपयात पीक विमा योजना बंद केली तरी सर्व जिल्ह्यांत आधुनिक व यांत्रिकी शेतीसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे.