रिफायनरी प्रकल्पाबाबत जनजागृती करण्याकरिता राजापूर येथे कार्यशाळेचे आयोजन
लक्ष्मीकांत घोणसेपाटील|रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू येथील रिफायनरी बाबत जनप्रबोधन आणि जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत सकारात्मक प्रतिसाद लाभला. रत्नागिरी जिल्हा आणि राज्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरणार असून यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे या भूमिकेतून जनप्रबोधन करण्यात येत आहे त्याला विविध गावांमधून सकारात्मक प्रतिसाद देखील लागत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड व हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यामाने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग प्रस्तावित आहे.महाराष्ट्र शासनाचा उपक्रम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्पाकरिता राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरातील जमिनीचे अधिग्रहण नियोजित आहे. देशाच्या व राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प असून परिसराचा सर्वांगीण विकास करणार आहे तसेच लाखो युवक युवतींना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन समाजातील विविध घटकांचे प्रबोधन करण्याची मोहीम आखली आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी राजापूर तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवक यांची एक कार्यशाळा राजापूर पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रकल्पाची माहिती, त्याचे महत्व तसेच जनमानसातील प्रकल्पा बाबतचे आक्षेप व त्यांचे निराकरण अशा विषयाची साधक बाधक चर्चा झाली व माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अधिपत्याखाली उपविभागीय अधिकारी राजापूर व तहसीलदार राजापूर यांच्या समन्वयाने करण्यात आले. या कार्यशाळे करिता रत्नागिरी रिफायनरी चे अधिकारी सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. प्रबोधनाच्या या कार्यशाळेस सुमारे 50 तलाठी व 50 ग्रामसेवक शासनाच्या इतर अधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते. प्रबोधनाच्या उपक्रमास अतिशय सकारात्मक प्रतिसाद लाभला असून प्रबोधनाचे हे कार्य स्थानिक प्रशासनिक अधिकारी व कर्मचारी वृंदांमार्फत अधिक जोरकसपणे तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत नेले जाईल अशी ग्वाही उपस्थितांनी दिली.