पार्थ पवारच्या फोनने शरद पवारांची नाराजी मिटली? राज्यातील राजकीय हालचाल गतीने
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी नेता गमावला. राज्याचा कारभार आणि आर्थिक घडी याची सखोल जाण असलेला नेता अचानक काळाच्या पडद्याआड गेला. बारामतीजवळ घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. सुरुवातीला पवार कुटुंब एकत्र दिसले, मात्र काही तासांतच अंतर्गत मतभेद उघड झाले. रात्री उशिरा सुनेत्रा पवार आपल्या मुलांसह मुंबईत पोहोचल्या. आज संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि राजकीय घडामोडींना वेग आला.
दरम्यान, शरद पवार यांनी या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवार थेट बारामतीला पोहोचले. शरद पवार यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही उपस्थित होते.
बैठकीनंतर पार्थ पवार आईशी फोनवर बोलताना दिसले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला कुटुंबातील कोण उपस्थित राहणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती आणि त्याची घोषणा ठरलेल्या दिवशी होणार होती, असेही सांगितले. एका बाजूला बारामतीत चर्चा सुरू असताना, दुसऱ्या बाजूला मुंबईत देवगिरी बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू असल्याने राजकीय चित्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
थोडक्यात
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी व जाणकार नेता गमावला
राज्याचा कारभार आणि आर्थिक घडी यांची सखोल समज असलेला नेता अचानक काळाच्या पडद्याआड
बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा
सुरुवातीला पवार कुटुंब एकत्र दिसले, मात्र काही तासांतच अंतर्गत मतभेद उघड
रात्री उशिरा सुनेत्रा पवार आपल्या मुलांसह मुंबईत दाखल

